

Apathy among farmers for cultivating safflower crop
विठ्ठल कटके
रेणापूर : शेतीसाठी खत, पशूधन, मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या करडईचा पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल घटला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये करडईची पाहिजे तशी आवक होत नसल्याचे चित्र आहे.
लातूर बाजार समितीत करडईला सरासरी क्विटंलमागे ४७०० ते ५५०० असा दर यंदाच्या हंगामात राहिला आहे. असे असले तरी पंधरावीस वर्षांपूर्वी शेतकरी या पिकाची ज्या उत्साहाने लागवड करीत होता, तशी करत नसल्याचे चित्र आहे.
रेणापूर तालुक्याचेच उदाहरण घ्यावयाचे तर पंधरा वर्षांपूर्वी तालुक्याच्या एकूण रब्बीच्या ४४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर करडईचे पीक घेतले जात होते. आता केवळ पाचशे ते सहाशे हेक्टरवर करडईची लागवड केली जाते. त्याची जागा हरभरा या नगदी पिकाने घेतली आहे.
शेतीकामासाठी मजुरांची अडचण, खते कीटकनाशकांच वाढलेले दर तसेच हे काटेरी पीक असल्यामुळे याची काढणी मजुरांना नकोशी झाली आहे. या पिकाचा पेरा वाढविण्यासाठी कृषी खात्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. करडई पिकामधून जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा लागणार आहे. उत्पादित झालेल्या इतर काही पिकांना शासनाकडून हमी भाव दिला जातो त्याच धर्तीवर करडईलाही हमी भाव जाहीर करून करडईची शासनाने खरेदी केंद्रावर खरेदी करावी. जेणेकरून बाजारात करडईचे भाव स्थिर राहतील. करडई हे काटेरी पीक असल्यामुळे मजूर त्याची कापणी व मळणी करीत नाहीत. तेव्हा यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर हार्वेस्टर दिले जावेत, करडई तेलाच्या गाळपासाठी ग्रामीण भागात कारखाने सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
करडईचे उत्पादन मर्यादित असल्यामुळे हे तेल महाग असत त्यामुळे खाद्य पदार्थांत त्याचा सर्वात कमी वापर केला जातो. ग्रामीण भागात आजही लाकडी घाण्यावर किंवा यंत्रावर करडईचे तेल गाळले जाते. पाम तेलाच्या अमर्याद वापरामुळे हृदयविकार व इतर व्याधीना सामोरे जावे लागत आहे. शिवाय दरवर्षी पाम तेलाच्या आयातीवर देशाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जन-तेला खाद्यपदार्थात तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर करडईसारख्या पिकांना उत्तेजन देण्याची गरज आहे.