

पिंपळगाव रेणुकाई ः बैलजोडींच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर असल्यामुळे बैलांकडून ओढला जाणारा पारंपरिक लाकडी व लोखंडी नागर इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
ट्रॅक्टरने आधुनिक पद्धतीने यांत्रिक शेती केली जात आहे. त्यामुळे श्रमाची बचत होत आहे. त्याचबरोबर बैलांच्या वाढत्या किमतीमुळे आणि महाग झालेल्या चारापाण्यामुळे बैल सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. शेतकरी राजा पारंपरिक ऐवजी यांत्रिकीकरणाने शेती करीत आहे.
पूर्वीच्या काळातील विहिरीवरील मोट, शिवारातील खळे, बारा पंचा नागर ही शेतीची अवजारे या 1970 च्या दशकातील विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी बैलांच्या सहाय्याने ओढली जाणारी मोट वापरली जायची त्यातून आलेले पाणी खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांना दिले जात होते.
पिकांच्या मळणीसाठी शेतात शेनानी सारून तयार केलेले खळे असायचे शेतीच्या पेरण्यापूर्व किंवा पेरणी पश्यातच्या मशागती या 6,8 किंवा12 बैल एकाच नागराला जुपून करण्यात येत होती अशा मशागती आता कालबाह्य झाल्या आहेत.
शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ पर्यंत बैलांचा नागर सुरू असायचा दिवसभराच्या विश्रांतीनंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा बैलांच्या समोर कंदील बांधून देखील रात्रभर शेती मशागत केली जायची. मे अखेरीलाच शेतकरी खरीप हंगामाची तयारी करून पेरणी टोकणीसाठी सज्ज असायचा परंतु जमिनीचा बदललेला पोत बागायतीमुळे बदललेली पीक पद्धत देखील बदलत गेली आहे.
यामुळे पूर्वीच्या आणि आता आधुनिक विज्ञान युगातील शेतीच्या मशागतीचा प्रकारच बदलला आहे शेतकऱ्याकडून शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे शेती करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे नागरांच्या फळाने शेत नांगरणारा शेतकरी केवळ चित्रकलेच्या पुस्तकातच पाहायला मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बैलाची जागा आता छोट्या पावर टीलरने घेतली आहे खतांच्या अतीवापरामुळे जमिनीची आद्रता कमी होऊन क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अशा क्षेत्राची मशागत करणे बैलजोडीच्या अवाक्याबाहेरचे ठरत आहे. दावणीला असणाऱ्या बैलांची संख्या कमी त्यामुळे पारंपरिक लाकडी, लोखंडी, शेतीच्या शेतात ही अवजारे आता अडगळीत पडली आहेत. दिवसेंदिवस बैलांचा वापर कमी होत चालला आहे . पर्यायाने जातिवंत खिल्लार पैदासीच्या किमती खूप महाग आहेत.
शेणखताचा मोठा तुटवडा- वेळ आणि मनुष्यबळ याचा कमी वापर करित आता यांत्रिकीकरणाच्या विविध साधनाचा अवलंब केला जात आहे. शेतीच्या मशागतीसह पेरणीपर्यंत यंत्रांचा वापर केला जात आहे. यामुळे पशुधनाची संख्या घटली आहे परिणामी शेतीला उपयुक्त असणाऱ्या शेणखत मात्र मिळत नसल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे जमिनीचा कस वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला असला तरी यातून उत्पादित पिकातून मानवी शरीराला रासायनिक अपायकारक सेवन वाढले आहे.
विजय देशमुख, शेतकरी
सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत 70 हजार ते 1 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यातच वर्षभर बैलांची राखण करणे, त्यांना खाद्य पुरवणे आदी न परवडणारी कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. मात्र, पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना अनुदान शासनाकडून मिळते. त्यामुळे ते पॉवर टिलरकडे वळताना दिसत आहे. हा एक सोपा उपाय असून यातून मेहनत कमी होऊन नांगरणी चांगल्या प्रकारे होत आहे.
गणेश मिसाळ शेतकरी