

Ahmedpur Cooperation Minister Babasaheb Patil livestock sector
नरसिंग सांगवीकर
अहमदपूर : १९७२ च्या दुष्काळात पंचक्रोशीतील अबालवृध्दांना जगण्याचे साधन बनलेले रमणा या स्थानिक नावाने ओळखले जाणारे सुनेगाव (सांगवी) ता. अहमदपूर येथील पशुप्रक्षेत्र आजमितीस शेवटची घटका मोजत असून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आपला विकास व्हावा. उध्दार व्हावा. यासाठी साद घालत आहे.
राज्याच्या पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर अखत्यारीत तालुक्यातील सुनेगाव सांगवी येथे पशुप्रक्षेत्र आहे. या पशुप्रक्षेत्राची तब्बल १९० एकर जमीन आहे. तथापि तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याच राजकीय धुरिणांनी किंवा या विद्यापीठातील जबाबदार अधिकारी किंवा विद्वानांनी या पशुप्रक्षेत्र विकासासाठी कोणतीची ठोस पावली उचलली नाहीत त्यामुळे स्वातंत्र्य नंतर आजतागायत या पशुप्र क्षेत्राचा कुठलाच विकास झाला नाही. २००८ च्या सुमारास हे प्रक्षेत्र बंद पडले होते. पण आता कसेबसे सुरू असून उदगीर येथील पशुवैद्यक विज्ञान महाविद्यालयातील जनावरे सांभाळण्याचे हे एक जुजबी केंद्र बनले आहे. तेथूनच या प्रक्षेत्राचा कारभार चालतो.
जवळपास १९० एकर विस्तीर्ण जागा, पायथ्याशी असलेले मन्याड धरण याचे मुबलक पाणी आणि नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग या प्रमुख मार्गाचा थेट संपर्क या सर्व अनुकूल बाबींमुळे संबंधित पशुप्रक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची संधी निर्माण झाली आहे.
बालाघाट डोंगररांगेच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला हा भाग कृषी, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सक्षम ठरू कृषि प्रक्षेत्र सुनेगाव शकतो. राज्यात सध्या सहकार मंत्री म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, कृषी, दुग्धविकास, शिक्षण व तंत्रज्ञान या क्षेत्रांचा दांडगा अनुभव आहे. केंद्रात सहकार मंत्री म्हणून कार्यरत असलेले अमित शहा हेही सहकार क्षेत्राला बळ देण्याच्या भूमिकेत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच बीड येथे झालेल्या 'महा पशुधन एक्स्पो' मध्ये दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राला जागतिक स्तरावर अग्रेसर करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचेही या भागाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने या प्रकल्पाला आवश्यक ते राजकीय पाठबळ मिळू शकते.
या पार्श्वभूमिवर या पार्श्वभूमीवर येथे कृषी विज्ञान केंद्र, दुधाळ जनावरांचे संशोधन व प्रजनन केंद्र, स्थानिक लाल कंधारी व देवणी जातींचे संवर्धन केंद्र, तसेच शेळी-मेंढी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची संधी आहे. भरडधान्य, भाजीपाला, टोमॅटो, सोयाबीन व कापूस प्रक्रिया उद्योग उभारून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी उपलब्ध होऊ शकते. शेतकरी भवन, प्रशिक्षण केंद्र आणि कृषी-दुग्ध व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक सुविधा उभारल्यास स्थानिक युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल. मन्याड धरण परिसरात मत्स्यव्यवसायाला चालना दिल्यास रोजगारनिर्मितीला नवे दालन खुले होईल. यासाठी पुढाकार घेतल्यास हे प्रक्षेत्र राज्यातील आदर्श समन्वित कृषी-पशुधन विकास मॉडेल ठरू शकते.
सध्या या पशुप्रक्षेत्राच्या १९० एकर जमिनीत २० एकरवर ज्वारी, सोयाबीन आणि धारवाड गवत लागवड केली आहे. पशुधनात देवणी गायी, गोरे, कालवड आणि ५५ शेळ्या आहेत. एक मोठा शेड शेळ्यांसाठी असून त्याजवळ चारापाण्यासाठी दुसरा शेड आहे; जुनी इमारत मोडली असून मोकळ्या जागेत दगडी गोठी आहेत. वारा-पावसामुळे जनावरांना धोका आहे. सहा कंत्राटी कर्मचारी काम करतात, परंतु त्यांना नोकरी किंवा पगाराची हमी नाही. देखरेखसाठी उदगीर येथील पशुवैद्यक नियुक्त आहे.