

Youth Seriously Injured in Assault Dies; Three Apprehended
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रेड्याच्या टकरीवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात गंभीर झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कदिम जालना पोलिसांनी सोमवार, दि. २३ रोजी कारवाई करत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे.
दरम्यान, रविवार, दि. २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रेम अशोक लाड (रा. गवळी मोहल्ला, जुना जालना) व त्याचा भाऊ रविंद्र लाड तसेच नातेवाईक नरेश अवचट यांच्यात आरोपी सोमनाथ अशोक लाड याच्यासोबत रेड्याच्या टकरीवरून वाद झाला.
हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी व त्याचे नातेवाईक यांना जुना जालना येथे बोलावण्यात आले. तेथे आधीच सापळा रचून आरोपींनी तलवार, चाकू व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रविंद्र अशोक लाड (वय २८) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढे कलम १०३(१) वाढविण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी संतोष श्रीचंद लाड, सुरज दादाराव सतकर (दोन्ही रा. इंद्रानगर, गवळी मोहल्ला) व सोमनाथ अशोक लाड (रा. संजय नगर) यांना पोलिसांनी २३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता काचराळा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जे. बी. शेवाळे आदींसह सपोनि. आरती जाधव, पोउपनि दिनकर मोरे, पोहेकॉ सदा राठोड आदींनी केली.