

वालसावंगी ः जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित अत्याचार, ब्लॅकमेलिंग व धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ वालसांगवी येथे शुक्रवार, दि. 8 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मूक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकरांनी केली.
दरम्यान, मोर्चामध्ये परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान ‘आरोपींना फाशी द्या’, ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘महिलांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर गेल्या दहा वर्षांपासून अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य संशयितासह त्याच्या कुटुंबातील आणखी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यान्वये विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. 2016 पासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून मार्च 2026 मध्ये पीडितेच्या घरात घुसून मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पारध पोलिसांनी चारही संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करत आहेत. दरम्यान, वालसांगवी येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसआरपीएफच्या तुकड्यांसह पारध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. संपूर्ण गावात छावणीसदृश वातावरण निर्माण झाले होते.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
दरम्यान, मूक आक्रोश मोर्चाच्या सांगतेनंतर ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांची उपस्थिती होती. या घटनेतील संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.