

Unseasonal rains have caused extensive damage across the district, including the talukas of Bhokardan and Jafrabad.
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन व जाफराबाद तालुक्यासह जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी वर्गावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. रब्बी हंगामातील पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी किमान रुपये आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले की, हरभरा, गहू, मका, कांदा यांसारखी काढणीस आलेली पिके तसेच टरबूज, खरबूज, आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपीट व अवेळी पावसामुळे उभी पिके आडवी पडून पूर्णपणे गेली असून काढणीस आलेले उत्पादन मातीमोल झाले आहे. याशिवाय ओलसर वातावरणामुळे रो-गराईचा प्रादुर्भाव वाढून गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन वर्षभराची मेहनत वाया गेली असून शेतकरी वर्ग सध्या अत्यंत चिंताग्रस्त व आर्थिक संकटात आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, महसूल यंत्रणेमार्फत तातडीने नुकसानग्रस्त पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच बाधित शेतकऱ्यांना विलंब न लावता थेट आर्थिक मदत वितरित करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा आंदोलन
शेतकऱ्यांना वेळेत मदत न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी दिला आहे.