

Unseasonal rains hit the Vaddavani mountain belt
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात काल दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. चिंचवण, कोठारबनसह परिसरातील अनेक गावांमध्ये या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, तूर तसेच टरबूज, आंबा पिकांना जोरदार फटका बसला असून उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक शेतांमध्ये वाऱ्याच्या तडाख्यामुळे पिके आडवी झाली आहेत. विशेषतः ज्वारी, गहू, हरभरा, तूर ही पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात होती. काही ठिकाणी गहू काढणीस तयार होते.
मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व श्रम आणि खर्च वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. डोंगरपट्ट्यातील आंबा बागांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला, तर काही ठिकाणी कच्ची फळेही झाडावरून खाली पडली. फळबागांनाही मोठा फटका बसला असून आंब्याच्या मोहोर आणि कच्च्या फळांची गळती झाली आहे. काही भागांत शेतातील जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे.
त्यामुळे दुहेरी संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनीही शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अचूक व वेळेवर अंदाज द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षणात्मक उपाय करता येतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतात जनावरांसाठी साठवून ठेवलेला कोरडा चारा ओला झाला असून पशुपालकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक संकटाने दुहेरी आघात केला आहे. वाऱ्याचा वेग मोठा असल्याने अनेक शेतांतील उभी पिके अक्षरशः आडवी झाली महसूल प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी केली आहे.