

जालना, पुढारी वृत्तसेवा : घरमालक आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील तब्बल १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना जुन्या जालन्यातील इतवारा गल्लीत घडली आहे.
फिर्यादी रेहान इद्रीस शेख (२१, रा. दादावाडी नवीन जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे काका सलीम नबी शेख हे ११ मे रोजी आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे फिरायसाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते.
२१ मे रोजी सायंकाळी काका रेल्वेने परत आल्यानंतर फिर्यादी त्यांना आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला. सर्वजण घरी परत आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले लाकडी असता बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी ३ तोळे वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (किंमत १,३५,००० रु.) आणि सोन्याची नाकातील फिरकी (किंमत ४,००० रु.) असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी दि. २७ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.