

Soybean crop cultivation on an area of 970 hectares
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात खरीप हंगामात ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्या सोयाबीनचे पीक जोमात आले. उत्पन्न भरघोस होऊन भाव मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.
पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी चिंतेत होते. नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा वेळी कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेतला. गावात शेतकरी मेळावे, शेतभेटी आणि मार्गदर्शन सत्रे घेऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी वेळेवर फवारणी, सापळ्यांचा वापर आणि नियमित पाहणी केली. यामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सध्या पिकाची स्थिती समाधानकारक आहे. शेतात हिरवागार सोयाबीन डोलताना दिसत आहे. यंदा कृषी विभागाने वेळेत मदत केल्याने मोठे नुकसान टळल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
हवामानाने साथ दिल्यास यंदा उत्पादनही चांगले मिळेल, अशी आशा आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष बाजारभाव आणि हमीभावाकडे लागले आहे