

Sand distribution to 1350 beneficiaries of Ashti
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी गावातील १ हजारक ३५७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मंजुरी व वाळूचे टोकन वाटप करण्यात आले. यामुळे घरकुल बांधण्यास लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.
ऊर्जा विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत हर घर सोलार योजनेचा शुभारंभ आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत १,३५७ लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वाटप सोहळा गुरुवारी (दि.१२) रोजी खंडेश्वर मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, मधुकर मोरे, रमेश भापकर, तुकाराम सोळंके, गजानन लोणीकर, रवी सोळंके, बाळासाहेब लहाने, रंगनाथ येवले, राजेंद्र बाहेती, बाबाराव थोरात, सुदाम प्रधान, कृष्णा टेकाळे, रामदास काका सोळंके, मोहम्मद जमीनदार आदीची उपस्थिती होती.
यावेळी आ. लोणीकर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात १,३५७ लाभार्थ्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात आले, जे ग्रामीण गृहनिर्माणाच्या प्रगतीचे द्योतक आहे. या योजनेंतर्गत घरांचा किमान आकार २५ चौरस मीटर असून, स्वच्छ अन्न शिजवण्यासाठी समर्पित क्षेत्राचा समावेश असल्याचे नमूद केले.
आ. लोणीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना चालू केली. या योजने अंतर्गत १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज पुरवण्यासाठी रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचा उद्देश सौरऊर्जेचा वापर वाढवणे, वीज बिल कमी करणे, आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सरपंच मधुकर मोरे, उपसरपंच नसरूल्हा काकड, बबलू सातपुते, अमोल मोरे, अनंता आगलावे, सईद शेख, रफिक राज, असेफ कच्छी, आफताब कुरेशी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणी ग्रामविकास अधिकारी डी. बी. काळे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन गांजाळे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली, ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे ८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली गेली. आयुष्मान भारत योजने अंतर्गत ५५ कोटी नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळाले असल्याचे आ. लोणीकर यांनी सांगितले.