

Manoj Jarange Patil Mumbai Agitation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत 'लढाई'ची तयारी सुरू केली आहे. "मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईला जाणारच," असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी मराठा समाजबांधवांना १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन आज (दि. ३१ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना केले.
पुढील 12 तारखेपर्यंत मुंबईकडे जा, आझाद मैदानात जाऊ नका, अन्यथा पोलिसांना मराठा मुंबईत यायला लागले आहेत, असा संशय येईल. मराठा समाजातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत १२ सप्टेंबरपर्यंत मुंबई गाठावी आणि तिथे आपल्या नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या पाहुण्यांकडे मुक्काम करावा, असेही जरांगे पाटील म्हणाले.
"मी मुंबईत आलो आहे, असा निरोप मिळताच सर्व समाजबांधवांनी तातडीने रस्त्यावर उतरावे," असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
आंदोलन कडक होण्याची शक्यता लक्षात घेता, "पोलिसांनी पकडून ठाण्यात नेले तरी मराठा बांधवांनी अजिबात घाबरू नये," असा धीर त्यांनी आंदोलकांना दिला. मुंबई आंदोलनाबाबत ठाम राहत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.