

Maratha reservation issue
वडीगोद्री: ‘मराठा धरून ओबीसी लोकसंख्या ६० टक्के आहे. बत्तीस टक्के आरक्षणात तुम्ही वेगळे प्रवर्ग केले, ते सगळे प्रवर्ग रद्द करायला पाहिजेत.आमच्या तरी नोंदी आहेत, तुमच्या तर नोंदी नाहीत, काहीही नाहीत, असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आज (दि.१३) पत्रकारांशी बोलताना अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.
गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास सिद्ध केलेला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु राज्य सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिले आहे, ते ५० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सांगत आहे की ५० टक्क्यांच्या वर गेलेले आरक्षण टिकत नाही. देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत, सगळे सरकारचेच लोक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवलं आहे.
मराठ्यांना एक आरक्षण आहे, दोन आरक्षण आहे, तीन आरक्षण आहे असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटत असेल आणि त्या क्षेत्रातून सुद्धा जर असे प्रश्न विचारले जात असतील, तर हे वेदनादायी आहे. आमचा समाजच तेवढा शिल्लक आहे त्यामुळे १० टक्के आमच्या संख्येनुसार पुरत नाही. ओबीसीत असून सुद्धा संख्येने आम्ही संपूर्ण राज्यात ५० /५५ टक्के आहे. या समाजाला दहा टक्के आरक्षण कसं पुरेल? त्यामुळे तुम्हाला दोन-तीन प्रकारचे आरक्षण आहे असं म्हणणं नेत्यांना शोभत नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे यावेळी बोलताना म्हणाले.
राज्य शासनाने अचानक सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने राज्यातील सुमारे ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद होणार आहे.भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय करू नका.याबाबत आम्ही सरकारला कळवलं आहे.पोरांचे पैसे द्या, अन्यथा सरकारला परीणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
भुजबळ यांना नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण आहेत या विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना जर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माणूस त्या लायकीचा पाहिजे.तुम्ही त्याची बाजू घ्यायला त्याला कोणती तुमची एवढी दया माया येते. तो भुजबळ प्रत्येकवेळी तुमच्या तंगड्यात तंगड्या घालतो .तुम्ही त्याची बाजू घेता याचं आम्हाला आश्चर्य वाटत. तुमचं ऐकून तुमच्यात काही बदल होतो का? बघा आमचं ऐकून अन्यथा तो तुम्हाला एक दिवस पायाखाली घालेल, असा इशारा जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला.
जालना जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव सुटले यावर बोलताना ते म्हणाले की,अजून मिळालं तरी कुठे आम्हाला आरक्षण.? छगन भुजबळांना फक्त तेवढाच नाद आहे राजकारण एके राजकारण, अशी टीका केली. हायकोर्टात आरक्षण सुनावणी सुरू झाली आहे यावर बोलताना ते म्हणाले की,आमचं १० टक्के आरक्षण ५० टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षणात घ्या, अशी आमची मागणी आहे. ५० टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही.आमच्या हक्काचं आरक्षण आम्हांला पाहिजे, असे जरांगे म्हणाले .