

Jalna news
शहागड : अकबर शेख
अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीवर पाणी घेण्यासाठी आलेल्या भाविकाचा पाण्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली.
रेवानाईक तांडा (झिरपी, ता. अंबड) येथील विठ्ठल देवसिंग जाधव (वय ३५) हे आपल्या वडिलांसोबत शहागड येथील जुन्या पुलाखाली असलेल्या गोदावरी घाटावर पाणी घेण्यासाठी आले होते. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने विठ्ठल जाधव यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शहागड येथील मिथुन परदेशी यांनी पाण्यात उतरून विठ्ठल जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, नदीत तरुण बुडाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घाटाकडे धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
विठ्ठल जाधव यांना प्रथम शहागड येथील सुकुंडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉ. सुकुंडे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. विठ्ठल जाधव हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे रेवानाईक तांडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.