

जालना : शेळी व कुक्कुटपालन व्यवसायात शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची ताकद असल्याचे मत कृषी रत्न विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले. जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने "अर्धबंदिस्त शेळीपालन" या विषयावर चार दिवसीय प्रशिक्षण १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना बोराडे म्ह४णाले कि, शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानात या व्यवसायाची कास धरावी व आपल्या आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो असे सांगीतले. या प्रशिक्षणातील शास्त्रोक्त माहितीचा पुरेपूर उपयोग करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेळीपालन व्यवसायकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी जे.ई.एस. महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थिंना शेळीपालन व्यवसायातील नेतृत्व गुण व उद्योजकीय कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले.
शेळी पालन व्यवसायाचे अर्थशास्त्र, चांगल्या निरोगी शेळ्यांची निवड, गोठा बांधणी या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. हनुमंत आगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेळ्यांचे विविध आजार व त्यावरील उपचार आणि लसीकरणाचे महत्त्व या विषयावर पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त योगेश अक्षेय यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
फायदेशीर शेळीपालन व्यवसायासाठी जास्त शेळ्या विकत न घेता कमी शेळ्या विकत घेऊन जास्तीत जास्त शेळ्या पैदास करण्याचे तंत्र व त्याचे अर्थशास्त्र निवृत्त प्राध्यापक अजीज खान यांनी आपल्या अनुभवातून कथन केले.
दरम्यान प्रशिक्षणार्थिंनी खरपुडी येथील यशस्वी शेळीपालक कैलास दत्तात्रय शेजुळ यांच्या श्रेया गोट फार्म या युनिटला भेट देऊन तेथील शेळ्यांचे व्यवस्थापन, चारा पिक लागवड आणि आहार व्यवस्थापन या विषयी माहिती जाणून घेतली. निवृत्त पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. एस. कांबळे यांनी प्रशिक्षणार्थींना शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी यांच्या हस्ते झाले होते.
प्रमाणपत्राचे वाटप
यशस्वी प्रशिक्षणार्थिंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ हनुमंत आगे यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागातून 70 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थिंनी आपला सहभाग नोंदवला.