

आन्वा (जालना) : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी मक्याची वाढ खुंटून पीक चाऱ्यासारखे झाले असून सोयाबीनचीही अवस्था पालापाचोळासारखी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठे संकट आले आहे.
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मध्यंतरी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने पिकांनी कशीबशी तग धरली. मात्र, पिके ऐन फुलोऱ्यात आली आणि शेंगा लागण्यास सुरुवात झाली असतानाच पावसाने पुन्हा उघडीप दिली. परिणामी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला. मकाचे कणसे व फुले व शेंगा करपून गेल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
सध्या परिसरात मे महिन्यातील उन्हाळ्यासारखा कडक उन्हाळा जाणवत आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असून जमिनी अक्षरशः तापून निघाल्या आहेत. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी गावोगावी धोंडी काढणे, देवदेवतांना साकडे घालणे असे पारंपरिक उपायही सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप वरुणराजाची कृपा झालेली नाही. पावसाने दडी मारल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीही झपाट्याने खालावत आहे. पावसाचा आणखी खंड पडल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पेरणी, बियाणे, खते आणि औषधांवर खर्च करूनही पावसाच्या खंडामुळे पिके संकटात सापडली आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा लहरीपणा आणि बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मक्याचे पीक चाऱ्यासारखे झाले असून सोयाबीनच्या पिकाचीही वाढ खुंटून पाला पडत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महागडी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांची पाहणी करून शासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जवळपास दिड महिना पावसाने खंड दिल्याने मका, सोयाबीन, कापसासह इतर प्रमुख खरीप पिके वाळून चालली आहेत. जमिनीला भेगा पडल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल
- दौलत पाटील सिरसाठ, शेतकरी
चालू खरीप हंगामात अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत.
सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. पण पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. वाढत्या तापमानामुळे पिके करपत चालली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच पाण्याअभावी सोयाबीनची फुले व शेंगा गळून पडून असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
गणेश पाटील गव्हाणे, शेतकरी
मागील खरीपात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये अतिवृष्टीने विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप भरपाई न मिळाल्याची तक्रार आहे. एकीकडे गतवर्षीच्या पीकविम्याची भरपाई रखडलेली असताना दुसरीकडे यंदाचा खरीपही पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- अशोक पांडुरंग सिरसाठ, शेतकरी