

Jalna news: The number of cases of setting fire to garbage has increased
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. १ व प्रभाग क्रमांक १२ मध्ये साचलेल्या कचऱ्याला आग लावल्या जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांनी कचऱ्याला आग लावणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सुंदरनगर परिसरात राबीया मस्जिदच्या बाजूला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. महिनोन्महिने कचरा न उचलल्याने हा ढिग दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला होता. या कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे व जनावरेही मोठ्या प्रमाणात फिरू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या त्रासाला कंटाळून अज्ञाताने कचऱ्याला आग लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र त्यातून उठलेल्या धुरामुळे परिसरातील घरांमध्ये धूर शिरून नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. अशाच प्रकार प्रभाग क्रमांक १ मध्ये देखील घडला आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या मनपा प्रशासनाने आता संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आदेशाची पायमल्ली
सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास मनपा आयुक्त अशिमा मित्तल यांनी स्पष्ट मनाई केली आहे. कचरा जाळला जात असल्याने या नियमाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरून नागरिक, दुकानदार व वाहनधारकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला.