

सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई येथील राजेश कोरकाने खुन प्रकरण “नराधमांना फाशी द्या... राजेशला न्याय द्या...!” या आक्रोशाने रविवारी संपूर्ण रूई गाव हादरून गेले. युवक राजेश कोरकणे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत भव्य कँडल मार्च काढला. अनेकांनी मोबाईला फ्लॅश लाईट सुरु करुन केला निषेध.
बस स्टॉप, रूई येथून सुरू झालेला कँडल मार्च हनुमान मंदिरापर्यंत शांततेत पण तीव्र संतापाच्या वातावरणात पार पडला. प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती होती, डोळ्यांत अश्रू होते आणि ओठांवर एकच मागणी होती — “राजेशला न्याय मिळालाच पाहिजे.”
या वेळी महिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अनेक महिलांनी टाहो फोडत “आमच्या लेकराला न्याय द्या”, “खुन्यांना फाशी द्या” अशी भावनिक मागणी केली. संपूर्ण परिसरात शोक, संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांनी या घटनेला फक्त एका युवकाचा खून नसून समाजातील माणुसकीवर झालेला घाव असल्याची भावना व्यक्त केली. “आज राजेश गेला, उद्या कोण?” असा संतप्त सवाल उपस्थित करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
कँडल मार्चनंतर तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यामध्ये आरोपींवर मोक्का (MCOCA) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी, पीडित कुटुंबास सुरक्षा देण्यात यावी तसेच प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशा ठाम मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, भविष्यात हे प्रकरण अधिक तीव्र वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय व सुरक्षा बाबत आश्वस्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
“राजेशच्या रक्ताला न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. या अभूतपूर्व जनआक्रोशामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.