

Jalna News : Protests in Jalna against ED action targeting Comrade Pinarayi Vijayan
जालना, पुढारी वृत्तसेवा केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) टाकलेल्या धाडीचे तीव्र पडसाद जालन्यात उमटले आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाही आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित कारवाईच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जालना जिल्हा कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर माकपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
आंदोलक नेत्यांनी सांगितले की, बहुचर्चित एक्सालॉजिक प्रकरणाशी कॉम्रेड पिनराई विजयन यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने वेळ-ोवेळी स्पष्ट केले आहे. न्यायालयीन क्लिनचीट नि मिळालेली असतानाही केवळ राजकीय छळ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून ही मोहीम अखंडपणे सुरू ठेवण्यात आली आहे, जो लोकशाहीचा अपमान आहे.
केरळचे काँग्रेसचे नवनियुक्त मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर लगेचच ईडीने ही कारवाई केली. यावरून हे संपूर्ण नाट्य राजकीयदृष्ट्या रचलेले असल्याचा गंभीर संशय माकपने व्यक्त केला आहे. सीएमआरएल डायरीत ज्या व्यक्तींची नावे आहेत, त्यातील अनेक जण आजही केरळच्या राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
मात्र, त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ पिनराई विजयन यांनाच सातत्याने लक्ष्य केले जात असल्यामुळे या कारवाईमागील राजकीय सूडबुद्धी आता चव्हाट्यावर आली आहे. यावेळी माकप नेते मधुकर मोकळे, अनिल मिसाळ, वैजिनाथ लोंढे , भाकपचे प्रल्हाद पडुळ, भगवान कोळे, बाबासाहेब पाटोळे, रवी भदर्गे, गौरव चव्हाण, महादेव बरकूले, अशोक साळवे, मुरलीधर घोडे, दिगंबर मोरे, करण वंजारे, सुभाष शेजूळ यांच्यासह डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर थांबवा
आमचा कोणत्याही निष्पक्ष चौकशी प्रक्रियेला अडथळा आणण्याचा हेतू नाही. मात्र, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा जो उघड गैरवापर सुरू आहे, तो अजिबात सहन केला जाणार नाही. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांच्या बळावर जनतेच्या लोकशाही हक्कांवर आणि विरोधी नेत्यांवर हल्ला करत आहे असा घणाघात आंदोलक नेत्यांनी केला.