

Jalna News: Opposition goes on the offensive over incomplete works, potholes, and lack of cleanliness
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेच्या हद्दीतील अपूर्ण विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाईचा अभाव, अस्वच्छता आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या समस्या न सोडवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण व रास्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून, पाणीपुरवठा व सांडपाणी योजनांसाठी खोदलेले रस्ते पुन्हा व्यवस्थित न केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी उघडे मॅनहोल नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याने ते तातडीने बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापौर श्रीमती वंदना मगरे यांनी चार महिन्यांत एकही सर्वसाधारण सभा न घेतल्याचा आरोप करत प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे खरे यांनी म्हटले. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या केवळ अंतर्गत बदल्या करून कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अपात्र स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून पात्र उमेदवारांची नियुक्ती करावी, पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल (खोतकर), उषा पांगारकर, पूजा दिनेश भगत, सत्यभामा जाधव, पूजा योगेश भगत तसेच नगरसेवक दीपक राठोड, निखील पगारे, दुर्गेश कठोठीवाले, अमोल ठाकूर, अब्दुल सगीर शेख, संजय डुकरे आणि अश्विन अंबेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावरुन महानगर पालिकेत विरोधी पक्षाचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.