

जालना : नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. फेब्रुवारी व मार्च 2026 चा थकीत पगार त्वरित अदा करावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ (सिटू) संलग्न मराठवाडा मनपा-नप कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मनपा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे. मोबाईल व रिचार्ज खर्च न देता कर्मचाऱ्यांकडून स्कॅनिंगचे काम करून घेतले जात आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या उपोषणात हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे, संजय जगधने आणि मंगलबाई साळवे सहभागी झाले असून आंदोलनाला मोठ्या संख्येने कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
फेब्रुवारी व मार्च 2026 चा थकीत पगार त्वरित द्यावा, नवीन आकृतिबंधानुसार कामगार भरती करावी, सफाई कामगारांसाठी घरकुल योजना लागू करावी, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सुविधा द्यावी, कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, सर्व सफाई कामगारांना सानुग्रह अनुदान द्यावे, घंटागाडी चालक व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार द्यावेत.