

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला अकृतिबंधानुसार ५ हजार ३०० पदे शासनाने मंजूर केली आहेत. त्यापैकी महापालिकेत सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ३०० एवढी आहे. तर तब्बल १ हजार ९०० हून अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. यातील अर्ध्याहून अधिक कंत्राटी कर्मचारी हे मागील दहा वर्षांपासून मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सीमार्फत महापालिकेत कार्यरत आहेत. परंतु यातील अनेकांना आता टप्प्याटप्प्याने कपात केले जाणार आहे. २२२ पदांच्या भरती प्रक्रियेनंतर तेवढेच कंत्राटी कपात केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेतील रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत अद्यापही महापालिकेकडून मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मागील १० वर्षांत केवळ दीडशेच कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली आहे. परंतु नोकर भरतीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. महापालिकेसाठी शासनाने अकृतिबंध मंजूर केल्यानंतर दोन टप्प्यात चारशे कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी दिली होती.
गेल्या वर्षी यातील १२५ पदांसाठी महापालिकेने भरती प्रक्रिया राबविली. शासनाच्या आयबीपीएस एजन्सीसोबत मनपाने या भरतीसाठी सामंजस्य करार केला होता. आता पुन्हा याच एजन्सीमार्फत २२२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्राप्त ५७ हजार अर्जापैकी ३१ हजार ८६७जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
आता लवकरच या पात्र उमेदवारांना परिक्षेची तारीख आणि हॉलतिकीट पाठविले जाणार आहेत. या परीक्षा आयबीपीएस एजन्सीकडून राबविण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया राबवून पात्र उमेदवारांची मेरीट लिस्ट महापालकेला सादर केली जाते. त्यातून उमेदवार निवडून त्यांना सेवेत रुजू होण्यासाठी नियुक्तीपत्र दिले जाते.
दरम्यान, गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेनंतर जे कर्मचारी सेवेत रुजू झाले, त्यानंतरही कंत्राटींची संख्या जैसे थेच आहे. उलट त्यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे आता महापालिका कंत्राटींची टप्प्याटप्प्याने कपात करण्याच्या तयारीत आहे. २२२ पदांच्या भरतीनंतर पहिली कुऱ्हाड २२२ कंत्राटींवर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गतवर्षी दीडशे जण कपात केले
गेल्या वर्षी करमूल्य निर्धारक व संकलक विभागासह लेखा विभागातील सुमारे दीडशे कंत्राटींना महापालिकेने नारळ दिले होते. परंतु काहींना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. आता टप्प्या टप्प्याने सर्व कंत्राटी काढण्याचे नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागाला दिले आहे.
नगरसेवकांचा ताण
आमच्या लोकांना कंत्राटी तत्त्वावर सेवेत घ्या, असे म्हणत महापालिकेच्या ११५ पैकी जवळपास शंभराहून अधिक नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र दिले आहे. हा ताण पाहून आता प्रशासनाने आहे ते सर्व कंत्राटी हळूहळू कपात करण्याची तयारी सुरू केली आहे.