

जालना : जालना शहरात काँग्रेस पक्षाची घडी नीट बसत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाला महानगर पालिकेच्या निवडणुकीत मदत केल्याचा ठपका ठेवत पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी आरोप - प्रत्यारोप होत असल्याने काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह चव्हट््यावर आला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शुक्रवार, दि. 10 रोजी महिला काँग्रेसच्या निलंबित जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानी माझे निलंबन बेकायदेशीर असून, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनीच पक्षविरोधी काम केले आहे. देवाणघेवाण करून तिकीट वाटप केल्याचा आरोप करत त्यांचीच पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
नंद पवार यांनी आपल्यावरील पक्ष निलंबनाची कारवाई ही बेकायदेशीर असून कोणताही खुलासा मागविण्यात आला नाही. आपण मागासवर्गीय महिला असल्यामुळे जातीय द्वेषातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. परिणामी, पक्ष वाढीला ब्रेक लागला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रभाग क्रमांक चारमध्ये आपली उमेदवारी जाणीवपूर्वक रद्द करून पराभव घडवून आणल्याचा आरोप करत पवार यांनी गणेश पाटील व इतर पदाधिकाऱ्यांवरही टीका केली. दरम्यान, या सर्व आरोपांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पक्षश्रेष्ठी याकडे कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.
यांच्यावर केली निलंबनाची कारवाई
ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद, जिल्हाध्यक्षा नंदा पवार, नगरसेवक, फरूक सादिक तुंबीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अन्सारी, सुनील बोरडे, मयुरी देने, रुबीना पठाण, अनिल तिरुखे.