

Jalna Chief Coordinator of Maratha Kranti Morcha Dr. Sanjay Lakhe
जालना, पुढारी वृत्तसेवाः छत्रपती संभाजीनगर येथे मराठा तरुणांशी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी असभ्य वर्तन केले हे निषेधार्ह आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ०२ सप्टेंबर शासन आदेशासह इतरही गंभीर विषयावर चर्चेसाठी उपसमितिची बैठक आयोजित करुन चर्चेसाठी बोलवावे नसता परिणामाला तयार रहावे असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिला आहे.
संजय लाखे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले कि, छत्रपती संभाजी नगर येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा तरुणांच्या रास्त रोषाला सामोरे जावे लागले होते.
त्यांनतर पोलिसांच्या सुरक्षित कड्या आड लपून पोलिसांच्या आडूनच त्या तरुणांशी उभ्या उभ्याच असभ्यपणे चर्चा केली. जी निषेधार्ह आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेनंतर मराठा समाजातील कार्यरत विविध सामाजिक संघटना, विधिज्ञ, अभ्यासक, समन्वयक, याचिकाकर्ते यांच्याशी उपसमितीची अधिकृत चर्चा घडवून आणत ०२ सप्टेंबरच्या शासन आदेशाने मराठ्यांना कसे आरक्षण मिळणार आहे?
मराठा समाज आरक्षणास कसा पात्र होणार आहे? हैदराबाद गॅझेट नेमकं कसे लागू होऊन उपयोगी आहे आणि त्यासाठी नेमकी मार्गदर्शक मानक कार्यपद्धती (एसओपी) राज्य सरकार कधी जाहीर करणार आहे या आणि मराठा समाजाच्या इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करावी असे जाहीर आवाहन करून तसे इमेल सुध्दा विखे पाटील यांना पाठवले होते.
परंतु महिना उलटून गेला तरी अद्याप त्यांचा प्रतिसाद नाही. हे अतिशय संतापजनक आहे आणि यांचे परिणाम विखे पाटील यांना आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात भोगावे लागतील. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून आक्रमक मराठा युवकांनी केली आहे. याचे पर्यवसान पुढील काळात खळ्ळखट्याक मधे झाले तर ती जबाबदारी वैयक्तिक राधाकृष्ण विखे पाटील यांची असेल असेही डॉ. संजय लाखेपाटील यांनी सांगितले आहे.
मराठा समाजाच्या आर-क्षणासाठी ०२ सप्टेंबर शासन आदेशासह इतरही गंभीर विषयावर चर्चेसाठी उपसमितिची बैठक आयोजित करून आम्हाला तातडीने चर्चेसाठी बोलवावं असेही आवाहन डॉ संजय लाखेपाटील यांनी केले आहे. विशेषतः संपूर्ण मराठवाडा, व अहिल्यानगर, नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्र हा अतिशय गंभीर ओल्या दुष्काळाचा सामना करत असतांना अद्याप शासकीय मदत नाही.
संतापजनक प्रकार अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक, कारागीर, पशुपालक यांना काळ्या दिवाळीला सामोरे जावे लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील हे पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुणचार झोडत आहेत. संवेदनशील राज्यात संवेदना गोठल्याचे निदर्शक असून म्हणून अतिशय संतापजनक असल्याचेही डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली.