

Guaranteed price for soybeans through NAFED
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा :
नाफेड सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनला केवळ ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. अत्यंत कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कमी भाव मिळणे ही गंभीर बाब शासनाच्या लक्षात आली. त्याचाच परिणाम म्हणून नाफेडच्या माध्यमातून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलाचा भाग म्हणून जाफराबाद येथे नाफेड व कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार दानवे यांनी नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदी प्रक्रियेची सविस्तर माहिती देत राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या विविध योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, हा शासनाचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी अध रेखित केले.
सध्या नाफेड केंद्रावर सोयाबीनला ५ हजार ३४० रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिला जात असून जाफराबाद तालुक्यात चार खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच माहोरा, वरुड व बरंजळा या ठिकाणीही शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नाफेडमार्फत खरेदी झालेल्या सोयाबीनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'बाराव्या तासात' जमा होत असल्याने मध्यस्थांचा प्रश्नच उरत नाही, असेही आमदार दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितीत मान्यवराची भाषणे झाली. शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.
या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदराव पंडित, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुधीर पाटील, रविराज जैस्वाल, साहेबराव कानडेजे, मधुकर गाडे, कृष्णा पिठोरे, विजय वैद्य, गोपाल काळे, गणेश पैठणकर, दिनकर अंभोरे, आवा जाधव, प्रभाकर अंभोरे, विजय परिहार, संजय गौतम आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
प्रकल्पांमुळे पाण्याचा मुबलक पाणीसाठा
'ज्या गावांमध्ये वर्षानुवर्षे रब्बी पेरणी होत नव्हती, त्या गावांमध्ये आज जलसिंचन प्रकल्पांमुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतशिवार हिरवेगार झाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे आ. संतोष दानवे म्हणाले.