

Farmers oppose the solar project; the Swabhimani Shetkari Sanghatana becomes aggressive
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील निम्न दुधना सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या अतिरिक्त जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात मंगळवार दि. २७ रोजी दुपारी जालना येथील पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची मुख्य अधीक्षक अभियंता यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
निम्न दुधना प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन दिली होती. मात्र, पाणी साठवणुकीसाठी संपादित करण्यात आलेल्या सुमारे एक हजार एकर अतिरिक्त जमिनीवर शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा सोलार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मंठा तालुका यांच्या वतीने मुख्य अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. मंठा तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात लेली जमीन नियोजित उद्देशासाठी वापरण्यात आलेली नसल्याने ती जमीन मूळ शेतकरी मालकांना परत करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने निर्णय घेऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या बैठकीला परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, मंठा तालुकाध्यक्ष सतीश निर्वख, शिवाजी महाराज भोसले, बाळाभाऊ बिडवे, नामदेव खोसे, वैभव मानवतकर, अंशिराम आकबाडी, कल्याणराव लाटे, नवल सोनी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.