

Dhangar community protests for reservation; strict curfew imposed in Jalna and Ambad
जालना / अंबड, पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने शनिवारी (दि. १७) कठोर पाऊले उचलली. आंदोलक दीपक बोऱ्हाडे आणि समाजबांधव मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असतानाच प्रशासनाने जालना आणि अंबड शहरात शनिवारी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. यामुळे दोन्ही शहरांतील व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दीपक बो-हाडे यांना नजरकैदेत ठेवल्याने त्यांच्या निवासस्थानाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
धनगर आरक्षण लढ्याचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी २१ जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १७ जानेवारी रोजी जालना व अंबड येथून हजारो समाजबांधव मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली. तसेच, सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच संचारबंदीचे आदेश जारी केले.
शाळा, बाजारपेठा बंद; रस्त्यावर शुकशुकाट शनिवारी सकाळीच संचारबंदी लागू झाल्याने जालना आणि अंबडमधील शाळा, महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले.
दडपशाहीने आंदोलन दबणार नाही
पोलिसांनी मुक्तेश्वर द्वार परिसरातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त ठेवत दीपक बोऱ्हाडे यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. यावेळी माध्यमांशी बोलताना बो-हाडे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. सरकार दडपशाही आणि दहशतीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आंदोलन दाबल्याने दबणार नाही. समाजबांधवांनी संयम सोडू नये, पोलिसांशी हुज्जत घालू नये, पण आपल्या मागणीवर ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जामखेडमध्ये टायर जाळून सरकारचा निषेध
जामखेड (ता. अंबड) दीपक बोहाडे यांना रोखल्याचे वृत्त समजताच अंबड तालुक्यातील जामखेड येथे धनगर समाज आक्रमक झाला. समाजबांधवांनी बसस्थानक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर टायर जाळून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी जालन्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.
संचारबंदीतून यांना सूट
अत्यावश्यक सेवाना त्यातून वगळण्यात आले होते. यामध्ये दवाखाने, औषध दुकाने, दूद्घ वितरण, पाणीपुरवठा, वीज वितरण, रेल्वे सेवा आणि प्रसारमाध्यमांना सूट देण्यात आली होती. शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटके बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
परळीत संताप, पोलिस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने
परळी वैजनाथ : धनगर आरक्षणासाठी लढा देणारे अंबड येथील नेते दीपक बोराडे यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. या घटनेचे तीव्र पडसाद परळीत उमटले असून, संतप्त समाजबांधवांनी शहर पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत अटकेचा निषेध नोंदवला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी २१ जानेवारी रोजी मुंबईत धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने ते संवाद दौरे करत होते. मात्र, अंबड पोलिसांनी आज सकाळी त्यांना प्रथम नजरकैदेत ठेवले आणि नंतर अटक केली. बोराडे यांची सुटका करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.