

भोकरदन : गत दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शेतातील विहिरी आणि कूपनलिकांना (बोअरवेल) यांना नव्याने पाणी आले आहे. यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, मका यांसारखी पिके कोमेजून लागली होती. पिके हातातून जातात की काय, अशा भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, गेल्या ४८ तासांपासून भोकरदन शहर व ग्रामीण भागात रिमझिम आणि संततधार पाऊस सुरू आहे.
या पावसामुळे सुकत आलेल्या पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन आणि कापसाच्या पिकांना या पाण्याचा मोठा फायदा होणार असून, उत्पन्नात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसाचा जोर जरी मध्यम असला तरी सतत पडणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा वाढला आहे.
सततच्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित
सततच्या पावसामुळे शेतातील लहान-मोठे नाले वाहू लागले आहेत. विहिरींच्या आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे. खरीप हंगामातील पिकांची स्थिती अधिक सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.