

Cabbages dumped by the roadside due to lack of market price
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली फुलकोबी व्यापाऱ्यांनी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारात मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी फुलकोबी घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांना ती रस्त्याच्या कडेला फेकून दिली आहे.
पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी दररोज सकाळी भाजीपाला घेऊन बाजारात येतात. यावेळीही अनेक शेतकऱ्यांनी फुलकोबीची मोठ्या प्रमाणात आवक केली होती. परंतु व्यापाऱ्यांनी "भाव पडला आहे" आणि "माल निघत नाही" असे सांगून खरेदी करण्यास नकार दिला.
पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेली फुलकोबी रस्त्याच्या कडेला ओसाड जागेवर टाकली अनेक पोती फुलकोबी अर्धवट खराब अवस्थेत पडून आहेत. एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडे योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. "खत, बी-बियाणे, मजुरीचा खर्च निघत नाही. व्यापारी मनमानी करतात. यामुळे भाजीपाला, भुसार मालाला हमीभाव देण्यात यावा. शासनाने याकडे लक्ष द्यावे" अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हमीभाव द्यावा
गेल्या काही दिवसांपासून बाजारात तेल, शेंगदाणे, साखर, चना डाळ यासह सर्वच जीवनवश्यक वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. भाजपीला व शेतमालाच्या भावात वाढत होत नाही. शासनाकडून शेतकऱ्याविरोधा दुजाभाव होत आहे. शासनाने भाजीपाला व शेतमालास हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे.