

पिंपळगाव : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, सेलुद, वडोद तांगडा, लिहा परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने कहर केला असून, सोयाबीनचे पीक जागेवरच कोमेजून चालले आहे. ऐन वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत असलेले पीक पाण्याअभावी माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
यंदा पेरणीच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली होती. उशिरा का होईना पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पीक चांगले बहरात आले असतानाच आता १५ दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. दिवसा तापमान ३० ते ३५ अंशावर पोहचत असून, जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला आहे.
त्यामुळे सेलुद, वडोद तांगडा, पिंपळगाव रेणुकाई शिवारातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिवळे पडून कोमेजले आहे. आता पीक हातचे जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी विहिरींनीही तळ गाठला आहे, त्यामुळे पाणी देण्याचीही सोय नाही.
पंचनामा करावा आणि पीक विमा कंपनीला अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अन्यथा शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
विठ्ठल खडके