

आन्वा ः भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यंदा हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा निर्माण झाला असून, बियाणे व खतांच्या खरेदीला वेग आला आहे.
25 मेपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून आता शेतकऱ्यांचे लक्ष 7 जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राकडे लागले आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असे अनुभवी शेतकऱ्यांचे मत आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुणांच्या अडचणीत भर पडली आहे.
खतांच्या वाढलेल्या किमती, हाताशी आलेल्या पिकाला मिळणारा तोट्याचा भाव आणि कर्जमाफीच्या बाबतीत झालेल्या फसवणुकीमुळे आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाला इंधन दरवाढीने आणखी संकटात टाकले आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, नांगरणी, वखरणी, हार्वेस्टर, मजूर वाहतूक या सगळ्यासाठी डिझेल आवश्यक आहे. डिझेल 95 रुपयांवर गेल्याने एकर नांगरट आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे.
बैलजोडी आणि शेतीची अवजारेही महाग झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. शेतीबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांनाही याचा फटका बसतोय. शेतीमाल शहरात नेणे, नोकरीसाठी प्रवास करणे महाग झाले आहे. आमच्या मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या स्वप्नांवर महागाईचा नांगर फिरत असल्याची भावना तरुणांमध्ये व्यक्त होत आहेत.
बियाणे भरपूर
खरीप हंगामासाठी आवश्यक खते व बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तरीही बाजारात मागणी असलेले बियाणे व खंत यांचा तुटवडा निर्माण होतो.