

जालना ः बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी पाच आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली.
घटनेची माहिती अशी की, 28 जुलै 2022 रोजी पीडितेचे पती व पीडिता त्यांच्या घरी झोपलेले असताना रात्री 12.30 वाजता या प्रकरणातील पीडितेच्या पतीला जाग आली. यावेळी पीडिता घरात दिसून आली नाही. त्यांची तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. त्याच दिवशी रात्री त्यांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपवर माहिती मिळाली की, पीडिता टेंभुर्णी बसस्थानकावर आहे. फिर्यादी पती त्यांच्या नातेवाईकांना घेऊन टेंभुर्णी बसस्थानकावर आले. तेथे त्यांना पीडिता झोपलेल्या अवस्थेत सापडली, त्यांनी पीडितेला घरी आणले.
तेव्हा तिने सांगितले की, तिला आरोपी संदीप याने दुचाकीवर बसवून सिल्लोड येथे घेऊन जातो असे म्हणून दाभाडी येथे एका लिंबाच्या झाडाखाली नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध केला. पुन्हा त्याच दुचाकीवर बसवून, दाभाडी दर्गासमोर मुस्कान नईम मिर्झा यांच्या मालकीच्या ढाब्यावर नेऊन तेथे अतिप्रसंग केला.
पीडितेला त्यांनी टेंभुर्णी बस स्थानकावर नेऊन सोडले. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणातील पीडिता ही भोळसर असल्याची माहिती समोर आली आहे.
यांनी केला युक्तिवाद
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड.वर्षा लक्ष्मीकांत मुकीम तसेच अतिरिक्त सरकारी वकील ॲड. शशांक ढोकरट यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी व पोलिसांनी पुरावे संकलित करून साक्षीदारांची साक्ष न्यायालयात मांडली. यात 7 साक्षीदार तपासण्यात आले.