Jalna News : रस्त्याची रुंदी वाढवून तांत्रिक चौकशी करा
आन्वा ः भोकरदन तालुक्यातील आन्वा ते जळगाव सपकाळ या राज्य महामार्ग 214 चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार जळगाव सपकाळ ग्रामपंचायतीने केली आहे. या कामाची तात्काळ तांत्रिक चौकशी करून रस्त्याची रुंदी वाढवावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत भोकरदन सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, शासनाने ठरवून दिलेल्या तांत्रिक निकषांचे या कामात उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेले विविध थर नियमानुसार टाकले जात नाहीत.
तसेच, कामाच्या ठिकाणी पाणी मारले जात नसल्याने रस्त्याच्या मजबुतीवर परिणाम होत असून वापरले जाणारे साहित्यही दर्जाहीन असल्याचा संशय आहे. सध्या रस्त्याची रुंदी केवळ 19.68 फूट ठेवण्यात आली आहे. मात्र, या मार्गावरील अवजड वाहतूक लक्षात घेता भविष्यात अपघात टाळण्यासाठी ही रुंदी किमान 32.8 फूट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर कामाचे इस्टिमेट तात्काळ जाहीर करावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी सरपंच विशाखाताई साळवे, उपसरपंच रुखमनताई रमेश सपकाळ, गावकरी गोकुळ सपकाळ, केतन साळवे, रत्नाकर सपकाळ, सुदाम सुदाम् सपकाळ, गणेश सपकाळ, योगेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव आणि सुरज मव्हारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
15 दिवसांत रस्ता उखडला
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी जळगाव सपकाळ येथील बस थांबा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फाटा हा रस्ता अत्यंत बोगस पद्धतीने तयार करण्यात आला होता. काम झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच तो उखडल्याने मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीच्या साम्राज्याने गावकरी मागील काही वर्षांपासून त्रस्त आहेत.

