

भोकरदन ः भोकरदन आणि जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप योजनेंतर्गत अडचणी येत आहेत, त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी गुरुवारी (दि.16) रोजी विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी पैसे भरूनही किंवा मंजुरी मिळूनही तांत्रिक अडचणींमुळे सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्पष्ट केले की, ज्या शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप मंजूर झाला आहे, परंतु अद्याप बसवलेला नाही. ज्यांचा कृषी पंप बसवण्यात आला आहे, परंतु काही कारणास्तव तो अद्याप सुरू झालेला नाही.
सौर कृषी पंप योजनेच्या अनुषंगाने इतर कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय तक्रारी असल्यास तातडीने जागेवर निपटरा करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले.
कागदपत्रांसह उपस्थित रहा- शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे आणि सौर पंपाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा विनाअडथळा सुरू व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे.
संतोष पाटील दानवे, आमदार, भोकरदन-जाफराबाद विधानसभा