

संघपाल वाहूळकर
जालना : जिल्ह्यातील ५३ जलसाठे गाळमुक्त करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सुपिक गाळ अंथरला आहे. शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेसाठी शासनाने २.३२ कोटींची मंजूरी दिली आहे. यातून शेतकऱ्यांना ३५ लाखांचे अनुदान दिले जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने १८ जून रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार एकूण ५३ जलसाठ्यांमधील संस्थांनी काढलेल्या गाळासाठी त्यांना निधीचे वितरण केले जाणार आहे.
८ सामाजिक संस्थांमार्फत हे काम पूर्ण केले आहे. अशासकीय संस्थांना १ कोटी ९६ लाख ६० हजार ४२ रुपये तर गाळ आपल्या शेतात वाहून नेऊन पसरवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३५ लाख ९४ हजार ६३० रुपये अनुदान थेट आरटीजीएस किंवा ग्रामपंचायतीमार्फत खात्यावर वर्ग केले जाईल. कै. वसंतराव नाईक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने ३ जलसाठ्यातील गाळ काढला आहे. संस्थेला ११ लाख ६ हजार ,६२६ रुपये निधी मिळणार आहे.
जालना जिल्ह्यातील संस्थांनिहाय कामाचा तपशील
कै. धर्मा नाईक विकास प्रतिष्ठान (पाहेगाव/जालना): ११ जलसाठे, एकूण निधी ८५,१७,८६० रुपये
छत्रपती राजे युवा प्रतिष्ठान (देवपिंपळगाव, बदनापूर): २ जलसाठे, एकूण निधी ६,५०,७४० रुपये.
नाथ ग्रामविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (जालना): २० जलसाठे, एकूण निधी ७५,१५,१९१ रुपये.
प्रेरणा फाउंडेशन : ३ जलसाठे, एकूण निधी ११,४३,५९० रुपये.
श्री संत मोतीराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (जालना): ६ जलसाठे, एकूण निधी १३,५४,१११ रुपये.
श्रीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (अकोली, परतूर): ४ जलसाठे, एकूण निधी १४,७५,६०० रुपये.
अवनी ॲप, जिओ टॅगिंगचे बंधन
मंजूर झालेला निधी वितरीत करताना पारदर्शकता पाळण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कामाची मोजमाप पुस्तिका, जिओ टॅग (Geo-tag), छायाचित्रे आणि 'अवनी ग्रामीण अॅप'वरील गाळाच्या प्रमाणाची पडताळणी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.