

जालना : जालना जिल्ह्यात 36 हजार 912 सौर कृषिपंप बसवण्यात आले असून कृषी पंप बसविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दिवसा पंप सुरू करून पिकांना पाणी देता येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचा जिल्ह्यातील 36 हजार 912 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. सौरपंपामुळे शेती सिंचनासाठी दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. आजपर्यंत या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 22 हजार 973 तर जालना जिल्ह्यात 36 हजार 912 सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत.
या योजनेत शेतकऱ्यांना सरकारकडून 90 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ 10 टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. सौर पॅनल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही.
शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहत नसल्याने त्यांना हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळाले. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येत आहे. पिकांना देण्यासाठी रात्री शेतात जाण्याचा शेतकऱ्यांचा त्रास वाचला आहे. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.
पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो. या योजनेमुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे.