

1,500 trees cut down on Jalna-Rajur road; claim to have planted 7,500
जालना, पुढारी वृत्तसेवा : जलाना ते श्रीक्षेत्र राजूर पर्यंत सिमेंटचा रस्ता बांधण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध आलेल्या, अथडळा होत असलेल्या सुमारे दीड हजार झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र, त्यापोटी पाच पट सुमारे ७ हजार ५०० झाडे लावल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र, झाडे कुठेच दिसून येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, राज्यात तपोवन वृक्षतोडीवरून संताप उसळला असतानाच जालना- राजूर राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे वास्तव समोर आले आहे. या महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे दीड हजार डेरेदार झाडे तोडण्यात आली, मात्र नियमांनुसार लावायची असलेली साडेसात हजार झाडे अद्याप कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे "वृक्षलागवड कधी करणार?" असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात अनेक महामार्गाचे रुंदीकरण झाले. पाचपट वृक्षलागवडीच्या अटीवर हजारो झाडे पाडली गेली. परंतु जालना जिल्ह्यातील कोणत्याही महामार्गाच्या कडेने तोडलेल्या झाडांएवढीही नव्हे, तर एकही झाड व्यवस्थित वाढलेले दिसत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
जालना-राजूर महामार्गाचे २८ किमी काँक्रीटीकरण अजयदीप इन्फ्रोकॉन प्रा. लि. या कंत्राटदाराला १६३ कोटामध्ये देण्यात आले होते. या कामादरम्यान १,५०० झाडांची निर्दय तोड झाली. पाचपट झाडे लावण्याची जबाबदारी कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची होती. मात्र आज या रस्त्यावर नवे झाडे लावले नसल्याचे दिसून येत आहे. किंवा लावलेली झाडे जगवली नसल्याचाही आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता अभिजित घोडेकर यांनी लागवड केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात झाडे कुठेच न दिसल्याने हा दावा नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही.
पर्यावरणाची झालेली अमाप हानी, सरकारी दाव्यांतील विसंगती आणि कंत्राटदारांची जबाबदारी या सर्वांमुळे तपासणी व कारवाईची मागणी जोर धरत आहे. एकीकडे शाश्वत विकासाची ध्येय पूर्ण करण्यासाठी शासन पर्यावरण संवर्धणाचा नारा देत आहे. तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सर्रासपणे पर्यावरण ऱ्हास करण्यात येत आहे. ५०-५०, १०० १०० वर्षांची झाडे या महामार्गाच्या बांधकामासाठी तोडण्यात आली. आता लावल्यानंतर ती केंव्हा मोठी होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
संवर्धणाचा नारा देत आहे. तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सर्रासपणे पर्यावरण ऱ्हास करण्यात येत आहे. ५०-५०, १०० १०० वर्षांची झाडे या महामार्गाच्या बांधकामासाठी तोडण्यात आली. आता लावल्यानंतर ती केंव्हा मोठी होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
झाडे लावल्याचा दावा
जालना ते राजूर या राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर पाचपट झाडे पुन्हा लावण्यात आली आहे, असा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता अभिजित घोडेकर यांनी केला आहे. मात्र, रस्त्यावर तर कुठे झाडे दिसत नाही, असे विचारले असता क्षणभर थांबून त्यांनी पुन्हा झाडे लावली आहे, असा दावा केला.