जालना, पुढारी वृत्तसेवा : घरगुती कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथून जालना येथे आलेल्या महिलेचा जालन्यातील खड्ड्यांनी जीव घेतला आहे. शहरातील लक्कडकोट भागात असलेल्या रस्त्यांवर सकाळच्या सुमारास खड्ड्यांमुळे पडल्याने मागून आलेल्या ट्रॅकने महिलेस चिरडले आहे. उषा योगानंद पवार(वय ६६, रा. औरंगाबाद) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यामध्ये दुचाकीस्वार आनंद योगानंद पवार (३५, रा. औरंगाबाद) हा देखील जखमी झाला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, शहरातील एका ठिकाणी आयोजित वास्तुशांतीचा कार्यक्रम आटपून सदरील महिला दुचाकीवरून आपल्या मुलासोबत जावयाच्या घराकडे निघाली होती. दरम्यान, लक्कडकोट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळून महिला खाली पडली. याचवेळी पाठीमागून येत असलेल्या ट्रकने महिलेस चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचार्यांनी महिलेचा मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, महिलेच्या मृत्यूमुळे नागिरक संतप्त झाले. नागरिकांनी घटनास्थळी जालना पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या प्रशासनाविरुद्ध रस्ता रोकून जोरदार घोषणाबाजी केली. लक्कडकोट ते दत्त मंदिर या रस्त्यावरून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. तरी शहर वाहतूक शाखेने या रस्त्यावरील वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.