जालना : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वारंवार कारखान्याकडे चकरा मारून ऊस न नेल्याने घनसावंगी तालुक्यातील भोगगावचे शेतकरी सुभाष सराटे यांनी पत्नीसह २७ मेरोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील शेतकरी शरद दिलीप रक्ताटे यांनी कारखान्याकडे वारंवार चकरा मारूनही ऊस जात नसल्याने ३० मेरोजी ऊस पेटवून दिला.
याचदिवशी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकरी आप्पासाहेब राऊत यांनी दोन एकरवरील उभ्या उसात रोटाव्हेटर फिरविला. यात त्यांचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. आप्पासाहेब राऊत यांच्याकडे ऊस तोडणीसाठी ४५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, जालना जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जालना जिल्ह्यात जवळपास ३ लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. यात अंबड व घनसावंगी तालुक्याती बिकट परिस्थिती आहे. पंधरा ते वीस महिने होऊन गेलेतरी कारखान्याकडून ऊस नेला जात नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत.
हेही वाचलंत का ?