

वसमत ः शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकाने महिनाभरात केवळ चार ते पाच दिवसच सुरू राहत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम, वेळापत्रक व अटी पूर्णतः धाब्यावर बसवून रेशन दुकानदारांकडून गरिबांच्या हक्काच्या धान्याशी सर्रास खेळ केला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
रेशन दुकान महिन्यात किमान 20 ते 22 दिवस सुरू ठेवणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात काही दुकाने आठवड्यातून एखाद-दोन दिवसच उघडली जात आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे, वृद्ध, महिला व गरीब नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना धान्य संपले, मशीन बंद आहे,
उद्या या अशी कारणे सांगून परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही दुकानदार ग्राहकांशी मुजोरीची भाषा वापरत वाद घालत असल्याचेही समोर येत आहे. तसेच रेशन दुकानाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असलेले वेळापत्रक, साठा फलक व दरपत्रक अनेक ठिकाणी दिसून येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्वस्त धान्य दुकानांना ई-पॉस मशीनवर डेटा मिळाल्यानंतर दुकाने सकाळ-संध्याकाळ नियमित सुरू ठेवणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात असा इशारा पुरवठा अधिकारी हांडे यांनी दिला.