

Farmers Protest Shiv Sena Thackeray
औंढा नागनाथ: शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्या वतीने बुधवारी (दि.११ ) औंढा तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. यावेळी ‘क्या हुआ तेरा वादा’च्या घोषणा देण्यात आल्या. ट्रॅक्टर मोर्चा हा हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामधून नवीन बसस्थानक, डॉ. हेडगेवार चौक, दिवंगत मीनाताई ठाकरे चौक, बाजार मैदान मार्गे तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा वादा केला होता. मात्र निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतून १५ हजार रुपये देणार, लाडक्या बहिणीला १५०० ते २१०० रुपये देणार, ४५ हजार गावात पाणंद रस्ते बांधणार, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील एसजीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करू, एक रुपयात पीक विमा, शेतमालाला हमीभाव देवू, बी बियाणे खताच्या किंमती नियंत्रित ठेवू, हर घर जल हर घर छत ,मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेऊ, वृद्ध पेन्शन धारकांना २१०० रुपये देणार, अन्नदाता बनेल ऊर्जेदाता, शेतीला २४ तास वीज आदी मागण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख,दत्ता अंभोरे,बालाजी करडीले, बबनराव इघारे,बाळू पाटील, कु-हे (पाटील), नवनाथ कु-हे (पाटील), चंद्रमणी पाईकराव, निखिल शेळके, अलीम खतीब, अनिल शिंदे, संजय भामीरगे, शंकर कदम, माऊली मगर, राजू पवार, अलीम खतीब, गजानन सोळंके, शिवाजी क-हाळे, प्रेम स्वामी, शंकर रावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते.