

Minister Yogesh Kadam inspected the agriculture affected by the rains
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव महसुल विभागात राज्याचे गृह, ग्रामविकस व महसूल राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा गुरुवारी (दि. २५) बाधित पिकांच्या पाहणीचा दौरा होतो. या दौऱ्यात त्यांनी मांजरा नदी काठच्या शेतातील प्रत्यक्ष बांधावर जावून व ट्रॅक्टरमध्ये बसुन पीकांची पाहणी केली. ज्यांच्या शेतातील पाण्याने जमिनी खरडुन गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासनाला दिले.
गुरुवारी (दि. २५) सकाळी रेणापूर येथील श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन मंत्री योगेश कदम यांनी पोहरेगाव महसुल विभागातील मोरवड, मोटेगाव, ब्रम्हवाडी, भोकरंबा, डिगोळ देशमुख, आरजखेडा, दर्जीबोरगाव व पो-हरेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बाधीत पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या वेळी मंत्री योगेश कदम यांनी शेतकऱ्यांना दिलासा देतांना सांगीतले की, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनी पाण्याने खरडुन गेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे वेगळे पंचनामे केले जातील, पुरात ज्यांची जनावरे वाहुन गेली असतील अशा पशुपालकांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल.
यासाठी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी लातूर रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे, तलाठी दिलीप देवकते, गटविकास अधिकारी सुमीत जाधव, मंडळ अधिकारी सानिया सौदागर, संजय घाडगे, कमलाकर तिडके, वैशाली सुर्यवंशी, सोनाली पकाले, भागवत पवार, अनंत चलमले यांच्यासह ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच शिवसेना शिंदे गटाचे सचिन दाने, कुलदिव सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
मंत्री योगेश कदम यांनी मांजरा नदीकाठच्या घुडघाभर चिखलात जाऊन तसेच ट्रॅक्टरवर बसून बाधित क्षेत्राची पाहणी केली. व बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तत्त्काळ आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासीत केले.