कनेरगाव नाका : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आज पासून हिंगोली येथून प्रारंभ झाला. मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे जरांगे-पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी कनेरगाव नाका, मोप, पिंपरी वायचाळ, कानडखेडा खुर्द, कलबुर्गा, वांझोळा, परिसरातील हजारोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जमला होता. राज्य महामार्गावर असलेले आंबाळा पाटीवर जरांगेंच्या स्वागतासाठी भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंबाळा, बोंडाळा, बोडखी, आंबाळा तांडा व आडगाव, भिंगी, बेलोरा, चिंचाळा या परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेथून जरांगे हिंगोली येथील संवाद व जनजागृती रॅलीसाठी रवाना झाले.