

हिंगोली : केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत 95 टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे.
केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार 2 ते 8 एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला.
या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे 5098 कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.
त्यापैकी 5022 कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर 4722 कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या 95 टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. देशभरात या अभियानांमध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून राज्याच्या या कामगिरीमध्ये हिंगोलीचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला हि जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होतील अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली.