वसमत, पुढारी वृत्तसेवा: वसमत येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांचे आज (दि.१२) सकल मराठा समाजाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने 50 क्विंटल फुलांची उधळण करण्यात आली. तर 10 क्विंटल फुलांनी तयार केलेल्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Manoj Jarang
वसमत येथे जिंतूर टि पॉईंट येथून सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने 50 क्विंटल फुलांची उधळण करण्यात आली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी शहर दुमदुमले होते. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कृष्णा गार्ड मंगल कार्यालयात संवाद सभा झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण आयुष्यभर तुरुंगात राहण्यास तयार आहे. अंतरवाली सराटीमध्ये महिला, मुलांना मारहाण करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना बढती देणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला लागलेला कलंक आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणार्या आमदार, मंत्र्यांना विजयाचा गुलाल लागू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. Manoj Jarang
राज्यात आमच्या कार्यक्रमात कुठेही जेसीबीने फुले उधळली की फडणवीसांच्या पोटात दुखत आहे. मराठा द्वेषानेच फडणवीस यांचे पोट फुगलेले आहे. मराठा आरक्षणाचे फलक काढल्यामुळे मराठा समाज आणखी त्वेषाने पेटून उठला आहे. मराठा समाजातील तरुणांची फौज निर्माण होत आहे. मराठा आरक्षण ओबीसीमधूनच घेणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केली. त्यानंतर वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे त्यांची संवाद सभा झाली. या ठिकाणीही रॅली काढण्यात आली.
हेही वाचा