हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करून शेवटच्या क्षणी हेमंत पाटील यांचे तिकीट कापून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ मतदार संघातून उमेदवारी दिली. परंतू त्यांचा पराभव झाला. हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाचे शिंदे समोर आव्हान आहे. त्यांना होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार की राज्यसभेत संधी देणार याबाबत आता जोरदार चर्चा झडू लागली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानपरिषदेसाठी वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी व रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे शिंदे सेनेने पुनर्वसन केले. परंतू मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर हिंगोलीची जागा सोडणार्या हेमंत पाटील यांना मात्र अद्याप कोणतीही संधी दिली नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
हेमंत पाटील यांना शिंदे सेनेने वार्यावर सोडले का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या हेमंत पाटील यांना 2019 च्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली. त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला होता. परंतू 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधानंतर ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हेमंत पाटील यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. हिंगोली ऐवजी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. परंतू वाशिममधून राजश्री पाटील यांचा पराभव झाला तर दुसरीकडे हिंगोली लोकसभा मतदार संघातून देखील शिंदे सेनेचे कोहळीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तर चित्र वेगळे असते असे राजकीय क्षेत्रातून बोलले गेले. हेमंत पाटील यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी नेमके काय साधले हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. शिंदे सेनेने भावना गवळी, कृपाल तुमाने यांचे पुनर्वसन केले. परंतू हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाचा मात्र विसर पडल्याचे दिसून येते. अत्यंत संयमी व धोरणी राजकारणी असलेले हेमंत पाटील हे सध्या शांत असले तरी शिंदे सेनेला हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाचा विचार करावाच लागेल असा दावा राजकीय तज्ञांमधून केला जातो आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ तीन महिने शिल्लक राहिले आहेत. विधान परिषदेवर पाटील यांना संधी देण्यात आली नसली तरी पक्षश्रेष्ठींसमोर पाटील यांच्या पुनर्वसनाचे अनेक पर्याय असल्याचे बोलले जात आहे. एकतर थेट राज्यसभेवर संधी दिली जाईल किंवा त्यांना पुन्हा नांदेड दक्षिण किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. यासंदर्भात माजी खासदार हेमंत पाटील यांना विचारले असता त्यांनी पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास आपण तयार आहोत. पक्षश्रेष्ठींच्या मनात नेमके काय चालले आहे हे मी कसे सांगू असे स्पष्ट केले.