

गोरेगाव : मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर विश्वास ठेवून गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांची पेरणी पूर्ण केली. मात्र पेरणीनंतर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने उगवलेले पीक आता करपून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
पेरणी झाली, पण पाणी नाही
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी एकदिलाने पेरण्या उरकल्या. जमिनीत चांगली ओल होती. मात्र त्यानंतर ढग दाटून येतात आणि निघून जातात, अशीच परिस्थिती आहे. रिमझिम पावसानेही हजेरी लावली नाही. सध्या शेतातील सोयाबीन 2 ते 3 पानांवर आहे. कापसाची रोपेही कोवळी आहेत. ओल नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी रोपे पिवळी पडून जळू लागली आहेत.
दुबार पेरणीचे संकट
"आम्ही कर्ज काढून बियाणे, खत, औषध आणले. पेरणी केली. आता 20 दिवस झाले पाऊस नाही. जर येत्या 3-4 दिवसात पाऊस नाही आला तर पुन्हा पेरणी करावी लागेल. त्यासाठी पुन्हा 8 ते 10 हजार रुपये खर्च येईल,अशी व्यथा गोरेगाव येथील शेतकरी यांनी व्यक्त केली. परिसरातील शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. विहिरी, बोअरवेलमध्येही पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे फवारणी किंवा ठिबकने पाणी देणेही शक्य नाही.
कृषी विभागाने पाहणी करावी
शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गावोगावी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करावी. तसेच दुबार पेरणीसाठी अनुदान, बियाणे अनुदान आणि पीक विम्याची अग्रिम रक्कम उपलब्ध करून द्यावी.