हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या, पण बोगस जैविक कीटकनाशक विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी करीत स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.२७) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठाण मांडले. विशेष म्हणजे यावेळी आंदोलनकर्त्यांनी कोंबडी, बकरा, दारू बाटली, सिगारेटसह चकणा कार्यालयात आणला होता. या अनोख्या आंदोलनामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली. (Hingoli News)
जिल्हयात बोगस जैविक कीटकनाशक व खते विक्री केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जैविक कीटकनाशक व खतांचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्याचा अहवाल अप्रमाणित आल्यास संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे निवेदनही दिले होते. मात्र, त्या निवेदनाला कृषी विभागाने केराची टोपली दाखवली. (Hingoli News)
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी कृषी कार्यालयात नोटा उधळून आंदोलन केले. नोटा घ्या पण कारवाई करा, अशी मागणी केली. त्यावेळी संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कारवाई झालीच नाही.
दरम्यान, बुधवारी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजता कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सोबत येताना कोंबडी, बकरा, दारु बॉटल, सिगारेट पाकीट, चकणा आणला होता. यावेळी अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या, पण कंपन्यांवर कारवाई करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देण्यासाठी धावपळ सुरु केली होती.
हेही वाचा