हिंगोली/ जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्हात जवळपास १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पेरणी योग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पेरणी करण्यात आली होती. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र त्यावेळी पावसाने पिकास जीवदान दिले होते.
खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस पडेल या नियोजनावर शेतकरी बांधव पेरणीस तयारी केली. पण आज सुध्दा परिसरात मुसळधार पाऊस पडलेला नाही. खरीप हंगामातील पावसाची जवळपास ७ नक्षत्र संपली आहेत. हस्त, चित्रा व स्वाती एकूण पावसाचे ३ नक्षत्र शिल्लक राहिली आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून जर जोरदार पाऊस लागला तर सोयाबीन पिकाचे उत्पन्न चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून जनावरांचा चाराही उपलब्ध होत नसल्याने शेतकरी बांधव हतबल होत आहे.
हेही वाचा :