हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या पॅकिंग युनिटमध्ये तसेच गोदामात असलेली सुमारे ५ हजार क्विंटल साखर भिजल्याने कारखान्याचे सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश दळवी यांनी दिली आहे. Hingoli News
पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरु होऊन सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. कारखान्यात तयार करण्यात आलेली साखर पॅकिंग युनिटमध्ये पाठवून त्या ठिकाणी पोते भरले जातात. त्यानंतर हे पोते गोडाऊन मध्ये ठेवले जातात. Hingoli News
मात्र, मागील दोन दिवसांत या भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे कारखान्याच्या पॅकिंग युनिटमध्ये पाणी शिरले. या शिवाय टीनशेडीमधूनही पाणी गळत असल्यामुळे तब्बल ५ हजार क्विंटल साखर भिजली आहे. यामध्ये कारखान्याचे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिवाय गोडावूनमधील काही पोते देखील भिजल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कारखान्याचे उत्पादन सध्या बंद करावे लागले आहे.
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतांमधून पाणी साचले असून त्यामुळे ऊसतोड करता येत नाही. शिवाय शेतात वाहने जात नसल्यामुळे वाहतुकही होत नाही. त्यामुळे शेतशिवारातील पाण्याचा पूर्णपणे निचरा झाल्यानंतरच ऊसतोड व वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे तुर्तास चार ते पाच दिवस तरी कारखान्याचे गाळप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसमत तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार ३३२ हेक्टर हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. ३. २० हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली आहे. या भागात नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्यानंतरच नेमके किती हेक्टरचे नुकसान झाले, हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा