

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाचा खरीप पिकांसह रब्बीचे पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. गहू, तुर, हरभरा, कापूस, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
हरभरा व गहू पिकात पाणी साचल्यामुळे क्षतीग्रस्त झाले आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन व कापूस याकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळवला होता. परंतु, सोयाबीनवर बुरशीजन्य व कापसावर लाल्या करपा रोग पडला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु गेल्या दोन दिवसांपासून औंढा नागनाथ महसूल मंडळात 84 मिलिमीटर, येळेगाव सोळंके 87 मिलिमीटर, जवळा बाजारात 88 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गोजेगाव शिवारात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लोहरा लक्ष्मण नाईकतांडा आधी माळरानावर अवकाळीने झोडपल्यामुळे जनावरे दगावली आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड होऊन शेतकऱ्यांच्या सोलर सिस्टीमचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी निवेदने तहसील कार्यालयाला देण्यात आली आहेत.
हेही वाचा